भारतीय जाहिरात उद्योगाची आई अशी ओळख असलेल्या जाहिरात गुरू तारा सिन्हा यांचे अलिकडेच निधन झाले. त्यानिमित्त त्यांचा हा अल्प परिचय....
......
केवळ भारतातच नव्हे, तर संपूर्ण जगात जाहिरात क्षेत्रातील धडाडीच्या महिला म्हणून तारा सिन्हा यांचे नाव आदराने घेतले जाते. भारतातील जाहिरात क्षेत्रातील पहिल्या महिला, त्याहीपेक्षा स्वतःची जाहिरात कंपनी स्थापन करणारी पहिली महिला म्हणजे तारा सिन्हा.
ज्या काळात महिला घरातून बाहेर पडण्याचे प्रमाण अत्यल्प होते, त्या काळात पुरुषप्रधान जाहिरात क्षेत्रात उतरणाऱ्या त्या एकमेव महिला होत्या. जनसंपर्क, परराष्ट्र व्यवहार, कॉर्पोरेट कम्युनिकेशन्स या सर्व क्षेत्रांत त्यांचे वर्चस्व होते. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मास कम्युनिकेशन, दिल्ली आयआयटी, अॅडव्हर्टायझिंग सब-कमिटी, असोचॅम अशा अनेक संस्थांशी निगडित असलेल्या तारा सिन्हा यांचे कर्तृत्व अत्यंत प्रेरणादायी आहे.
धनबादमधील चिरंजीवलाल आणि सीता पसरिचा या सुखवस्तू दाम्पत्याची कन्या असलेल्या तारा सिन्हा यांनी विशीच्या उंबरठ्यावर असताना जाहिरात व जनसंपर्क पदविकेचे शिक्षण घेण्यासाठी इंग्लंडला प्रयाण केले. त्याकाळी हे धाडसाचेच होते. १९५४मध्ये त्या डी. जे. केमर या जाहिरात कंपनीत नोकरीनिमित्त कोलकात्याला गेल्या; परंतु वर्षभरातच या कंपनीने भारतातील कारभार गुंडाळण्याचे ठरविले, तेव्हा तारा आणि सहकाऱ्यांनीही भागीदारीत जाहिरात कंपनी स्थापण्याचा निर्णय घेतला. त्यांनी क्लॅरियन ही कंपनी स्थापन केली. वयाच्या २३ व्या वर्षी तारा एका कंपनीच्या संचालिका होत्या. अर्थात, ही त्यांची स्वत:ची कंपनी नव्हती. ती बऱ्याच कालावधीनंतर प्रत्यक्षात आली.
त्याआधी ‘कोक’च्या अमेरिकी कंपनीने, तारा यांच्यासह काही वरिष्ठांना अमेरिकेत काम करण्याचा प्रस्ताव दिला. तो स्वीकारून तारा अॅटलांटा येथे गेल्या. तेथील कामाने आपणास आंतरराष्ट्रीय अनुभव दिला, असे त्या आवर्जून सांगत. १९७७ साली ‘जनता’ सरकारने या अमेरिकी पेयावर बंदी घातली. त्यांनतर तारा सिन्हा १९८४-८५ साली पुन्हा ‘क्लॅरियन’मध्ये परतल्या. तेथे पटेनासे झाल्यामुळे कंपनीने त्यांना कामावरून दूर केले. तारा यांनी जोडलेला ग्राहकवर्ग मात्र त्यांच्याचकडे राहिला. त्यांनी दिल्लीत ‘तारा सिन्हा असोसिएट्स’ या कंपनीची स्थापना केली.
जाहिराती म्हटले की, अलेक पदमसी ते प्रसून पांडेपर्यंतच्या जाहिरातकारांची नावे आठवतात, त्यात तारा यांचे नाव नसते; कारण तारा यांचे कार्यक्षेत्र सर्जनशील नव्हते, तर त्या जाहिरात व्यवस्थापन क्षेत्रात कर्तबगार होत्या. उत्पादकांना योग्य सल्ला देणे, कोणत्या माध्यमांतून कशी जाहिरात केल्यास परिणामकारकता वाढेल हे ठरविणे आदी कामांसाठी त्या ओळखल्या जात.
गेला काही काळ त्या कामापासून दूर होत्या. गेले सहा महिने त्या आजारीच होत्या. अखेर बुधवारी, ११ डिसेंबर २०१९ रोजी त्यांची प्राणज्योत मालवली.